एकीकडे काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एलएसीजवळ चीनच्या आव्हानाला भारत सक्षमपणे तोंड देत आहे. असं असतानाच संरक्षण प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तान हा भारताचा पहिल्या क्रमांचा शत्रू नसून चीन आहे, असं मत व्यक्त केलंय.

मागील काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर सतत काही ना काही घडामोडी घडत आहेत. याचसंदर्भात बिपिन रावत यांनी टाइम्स नाऊ समीटमध्ये माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या परिसरामध्ये डी-अॅक्सलरेशन करण्याऐवजी विघटन करणे (सर्व दूरपर्यंत सैनिकांची नेमणूक करणे) हे आमचं उद्देश आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान नाही तर चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, असं रावत म्हणाले. तसेच भविष्यात एकाचवेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर या शत्रूंना तोंड द्यावं लागू शकतं असंही रावत म्हणाले आहेत.

अरुणाचलच्या सीमेजवळ चीनने गाव वसवलं असल्याच्या बातम्यांसंदर्भातही रावत यांनी भाष्य करताना चीनच्या लष्कराने आधीचं बांधकाम पाडून नवीन बांधकाम उभारल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. चीन त्यांच्या बाजूच्या सीमा भागामध्ये विकासकामे करत आहे. आजच्या जामान्यामध्ये लोकांना उपग्रह किंवा गुगलच्या माध्यमातून फोटो मिळतात. यापूर्वी अशापद्धतीचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. असाच एखादा फोटो समोर आल्यानंतर घुसखोरी आणि ताबा मिळवल्याच्या चर्चा होतात, असं रावत म्हणाले.

चीन त्यांच्या सीमा भागांमध्ये विकास करत आहे त्याचप्रमाणे भारतही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या भागामध्ये मोठ्याप्रमाणात विकास कामं करत असल्याचं रावत म्हणालेत. आधी आपण एसएसीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्ते बांधत नव्हतो. चिनी सैनिक येऊन रस्ते तोडतील, त्यांचं नुकसान करतील अशी भिती आधी होती. मात्र आता तसं वातावरण राहिलेलं नाही, असा दावाही रावत यांनी केलाय.

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनचे सैन्य अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते, असंही रावत म्हणालेत. सैनिकांनी एवढ्या जवळ येऊन संघर्ष होऊ नये यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. २०२० एप्रिलच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती निर्माण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहेत, असंही रावत म्हणालेत.