Iran President Called PM Modi : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सध्या निवळल्याची परिस्थिती दिसून येत असली तरी मागील काही दिवसांपासून या दोन्ही देशांत संघर्ष सुरु होता. या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील तीन आण्विक तळांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट झाल्याचा दावाही अमेरिकेने केला. त्यानंतर इराणनेही कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले करत अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धसमाप्तीची घोषणा केली.
इस्रायल आणि इराणमधील संघर्षादरम्यान आणि त्यानंतर अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत त्यांच्याशी संवाद साधला होता. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीनंतर संवाद आणि राजनैतिक मार्गाने इराण आणि इस्रायलमधील तणाव कमी करण्याचे आवाहन भारताने केलं होतं. दरम्यान, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या आणि भारताने दिलेल्या नैतिक पाठिंब्याबद्दल आणि एकतेच्या संदेशांबाबत इराणने भारताचे आभार मानले आहेत.
इस्रायलशी झालेल्या अलिकडच्या संघर्षादरम्यान एकता आणि पाठिंबा दिल्याबद्दल नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने बुधवारी भारतातील लोक आणि संस्थांचे मनापासून आभार मानले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. इराणी दूतावासांनी म्हटलं की, भारतातील सर्व थोर आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे तसेच, राजकीय पक्ष, संसद सदस्य, स्वयंसेवी संस्था, धार्मिक आणि आध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते इराणच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल सर्व व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून आभार मानतो,” असे दूतावासाने म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं होतं?
इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणानंतर मोदींनी सांगितलं होतं की सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली आणि परिस्थिती बिघडत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत एक्सवरील पोस्टमध्ये माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, यावेळी त्यांनी तणाव कमी करण्याचा, संवाद आणि राजनयिकतेद्वारे समस्या सोडवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला. याचबरोबर प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित करण्यावर भर दिला. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या भूमिकेबद्दल आणि आवाहनाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.