Attack on Gaza aid centre : इराण आणि इस्त्रायलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करताना इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प देखील लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. असं असातानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने गाझा मदत केंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३८ पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भातील माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली असून त्यांनी म्हटलं की, “गाझाच्या दक्षिण भागात अन्न वितरण केंद्रांभोवती सोमवारी झालेल्या गोळीबारात ३८ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मदत केंद्रांभोवती दररोज होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेतील ही सर्वात मोठी आणि प्राणघातक घटना होती”, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

गाझा मानवतावादी फाउंडेशनद्वारे अन्न केंद्रे चालवली जातात. हजारो पॅलेस्टिनी अनेवेळा या केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी इस्रायली लष्कराच्या नियंत्रणाखालील झोनमधून जातात. या घटनेला साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, “दक्षिणेतील सर्वात वर्दळीच्या मदत केंद्रांपैकी एक असलेल्या रफाह केंद्रावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी पहाटे इस्रायली सैन्याने गोळीबार केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर या घटनेबाबत इस्रायली सैन्याने काहीही भाष्य केलेले नाही.”

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत मृत्यू झालेल्या पॅलेस्टिनींपैकी बहुतेक पॅलेस्टिनी रफाहमधील जीएचएफ केंद्राजवळ होते, तर काही जण खान युनूसच्या बाहेर नवीन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर होते. रफाह या ठिकाणी अन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन लोकांनी सांगितलं की, सैनिकांनी पहाटे ४ वाजता जवळच्या ट्रॅफिक सर्कलवर गर्दीवर गोळीबार केला. सध्या अलिकडच्या आठवड्यात या भागात वारंवार गोळीबार होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की गेल्या महिन्यात हे मदत केंद्रे उघडल्यापासून आतापर्यंत मदत मिळवण्याचा प्रयत्न करताना डझनभर पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तसेच शेकडो जखमी झाले आहेत. युद्ध आणि मदत वितरणावरील निर्बंधांमुळे गाझातील परिस्थिती बिकट बनली आहे. यामुळे जवळजवळ २० लाख लोकांचं जीवन धोक्यात आलं आहे.