जयपूर – मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने गोळीबार केल्याच्या बातमीने आज (३१ जुलै) सकाळी मुंबई हादरली. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ही महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या गुजरातच्या वापी स्थानकाजवळ आली असताना आरपीएफ जवानाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. या जवानाने एक्सप्रेसच्या तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि मीरा रोड स्थानक येण्याआधीच गाडी थांबवून बाहेर उडी मारली. आरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना मीरा रोड येथे तैनात रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर आरोपी जवानाची एक चित्रफीत वायरल झाली असून रेल्वे पोलीस त्याचा तपास करत आहेत.

या आरोपीचं नाव चेतन सिंह असं असून पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. चार लोकांना ठार केल्यानंतर चेतन सिंह ट्रेनमध्ये इतर लोकांना धमकावत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो म्हणतोय, “अगर वोट देना है, हिंदुस्थान में रहना है तो मोदी और योगी को दो, और आपके ठाकरे…” तो पुढे काय बोलला ते व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत नाहीये. या व्हायरल व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा >> “कितीही कपडे बदला, पूर्वीच्या कर्मातून…”, योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही व्हायरल व्हिडीओ क्लिप शेअर करत एआयएमआयएम पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. ओवैसी यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, हा दहशतवादी हल्ला आहे ज्यात विशेषतः मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या सातत्याने मुस्लिमविरोधी, चिथावणीखोर भाषणांचे हे परिणाम आहेत. आरोपी आरपीएफ जवान हा भाजपाचा भावी उमेदवार होईल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? मी जर चुकीचा ठरलो तर आनंद होईल.