नवी दिल्ली : आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त २५-२६ जून रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार केला जात आहे, असा दावा काँग्रेसने गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गंभीर मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न असेल. भाजपला पाकिस्तान, दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याऐवजी फक्त काँग्रेसवर हल्ला करण्यात रस असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला.
रमेश म्हणाले की, २२ एप्रिलच्या रात्रीपासूनच काँग्रेसने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी करीत आहे, परंतु ही बैठक अद्याप झालेली नाही. १० मे रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि ठरावाद्वारे देशाची एकता प्रदर्शित करण्याची विनंती केली, परंतु पंतप्रधानांनी त्याकडेही दुर्लक्ष केले, असे रमेश यांनी ‘एक्स’ संदेशात म्हटले आहे.
‘पंतप्रधान ज्यांनी ११ वर्षांपासून देशाला अघोषित आणीबाणीत अडकवले आहे, पहलगामचे दहशतवादी अजूनही फरार का आहेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीत मध्यस्थी का केली, आदींची उत्तरे देण्यास नकार देणाऱ्या पंतप्रधानांचा हा गंभीर मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा आणखी एक प्रयत्न असेल,’ असेही रमेश म्हणाले. सध्याच्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी पंतप्रधानांना ५० वर्षांपूर्वी घडलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यात रस असल्याचा आरोपही रमेश यांनी केला.
उपराष्ट्रपतींकडे दुर्लक्ष
घोषणा तसेच डायलॉगबाजी न करता, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाच्या आर्थिक विकासात शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात सहभागी करून घेण्याच्या केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेण्याचे आव्हान देत काँग्रेसने गुरुवारी केंद्रातील मोदी सरकावर टीका केली. माजी पंतप्रधान चरण सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनखड यांनी शेतकऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून मोठ्या व्यापारात सहभाग वाढविण्याचे आवाहन केले होते.