सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही आगळीक सुरूच आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून अर्निया, आर.एस.पूरा भागात पाककडून बेछूट गोळीबार करण्यात आला. भारताच्या दिशेने करण्यात आलेल्या या अंदाधुंद गोळीबारात सात गावकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. महिनाभरात पाकिस्तानने आतापर्यंत १२ वेळा शस्रसंधीचा भंग केला आहे.
सोमवारी रात्री उशीरा पाकिस्तानी सैन्याने कांचक आणि परगवाल येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तब्बल ४० ठाण्यांना लक्ष्य केले. आरएस पुरा आणि अर्निया येथील ठाण्यांवरही त्यांनी गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. परगवाल भागात अजूनही भारतीय सैनिक पाकच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देत असल्याचेही ते म्हणाले.