एखाद्या राज्यातील सत्ताधारी पक्षाविषयी जाणून घेण्यासाठी ज्याप्रमाणे अनेकांमध्ये उत्सुकता असते त्याचप्रमाणे ज्या ठिकाणहून राजकारणाची ही सूत्र चालतात त्या ठिकाणाविषयी म्हणजे राज्य विधीमंडळाच्या वास्तूविषयीही अनेकांच्याच मनात कुतूहल असतं. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरही सध्याच्या घडीला अशीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कर्नाटकमधील मतदार राजा कोणाच्या पदरात आपली मतं टाकणार यावरुन अवघ्या काही क्षणांत पडदा उचलला जाणार आहे. देशातील राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालानंतर कोणता पक्ष विधान सौधमध्ये अधिपत्य गाजवणार ही लक्ष देण्याजोगी बाब ठरणार आहे.

वाचा : सट्टाबाजारात भाजपाला पसंती, ९६ ते ९८ जागा जिंकण्याची शक्यता

*बंगळुरु येथे असणारी कर्नाटक विधानसभेची मुख्य वास्तू ‘विधान सौध’ या नावाने ओळखली जाते.
*म्हैसूरमधील द्रविड आणि भारतीय-मुस्लिम Indo-Saracenic स्थापत्यशात्रानुसार या वास्तूची बांधणी करण्यात आली आहे.
*या वास्तूच्या संकल्पनेचं संपूर्ण श्रेय केंगल हनुमंथैय्या Kengal Hanumanthaiah यांना दिलं जातं.
*हनुमंथैय्या यांनी युरोप, रशिया आणि संयुक्त राष्ट्रांना भेट दिल्यानंतर त्यांना या वास्तूच्या रचनेची संकल्पना सुचली.
*विधान सौधच्या बांधकामाला सुरुवात होताच १३ जुलै, १९५१ मध्ये या वास्तूची पहिली वीट ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ठेवली होती.
*१९५२ मध्ये सुरु झालेलं या वास्तूचं बांधकाम १९५६ला पूर्णत्वास गेलं. ज्यासाठी जवळपास १.४८ कोटी रुपये इतका खर्च आल्याचं म्हटलं जातं.
*चार मजले आणि एक तळघर, जवळपास ३०० खोल्या अशी रचना असणारी ही वास्तू ५०५, ५०५ चौरस फुटांच्या भूखंडावर मोठ्या दिमाखात उभी आहे.
*’वन इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशातील राज्य विधीमंडळाची ही सर्वात भव्य वास्तू म्हणूनही ओळखली जाते.
*विधान सौधच्या पश्चिमेकडील भागाची बांधणी ही राजस्थानमील भव्य राजवाड्यांपासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. तर उत्तरेकडील भाग हा म्हैसूरमधील कृष्ण राजा सागर या धरणापासून प्रेरित असल्याचं कळतं.
*कर्नाटकच्या विधान सौधमधील कॅबिनेट मिटींग हॉलमध्ये चंदनाच्या लाकडापासून कलाकुसर केल्याचं पाहायला मिळतं.