भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये काश्मीर हाच कळीचा मुद्दा आहे. तसेच याच वादग्रस्त मुद्दय़ावरून अण्वस्र्ो असलेल्या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी चौथे युद्ध होण्याची दाट शक्यता आहे, असे स्फोटक वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केल्याचे वृत्त येथील मुख्य वृत्तपत्र असलेल्या डॉनमध्ये देण्यात आले आहे. काश्मीर स्वतंत्र व्हायलाच हवे आणि ते माझ्या कारकिर्दीतच झाले पाहिजे, असेही शरीफ म्हणाले. पंतप्रधान शरीफ यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध अधिकच ताणले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वतंत्र जम्मू आणि काश्मीर समितीच्या अर्थसंकल्पीय सत्रात पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मात्र पाकिस्तान सरकारतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात याचा उल्लेख टाळण्यात आला आहे.
काश्मीरचा प्रश्न अतिशय संवेदनशील असून लोकभावना तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने सोडवणे आवश्यक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला असता त्यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढण्याचे मत व्यक्त, तर दुसरीकडे काश्मीरचा तिढा सामंजस्याने सोडविण्याची गरज असताना काश्मीर आपला अविभाज्य असल्याचे भारत सरकारकडून वारंवार बोलले जात असल्याचे शरीफ म्हणाले.
दोन्ही देशांतील शस्त्रास्त्र स्पर्धेबाबत शरीफ यांनी भारतावरच तोफ डागली आहे. भारतामुळेच शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत पाकिस्तान खेचला गेल्याचे शरीफ यांनी म्हटले असल्याचे डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
आमच्याकडे पर्याय असता तर शस्त्रास्त्रांवर होणारा वारेमाप खर्च आम्ही सामाजिक कामासाठी, तसेच नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी केला असता, अशी मुक्ताफळेही शरीफ यांनी या वेळी उधळली. त्याचप्रमाणे काश्मीर मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने महत्त्वाची भूमिका निभवावी, असेही शरीफ म्हणाले.
पाकिस्तानचे घूमजाव
काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चौथे युद्ध होण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्येच छापून आल्यानंतर खडबडून जागा झालेल्या पाकिस्तानने लगेचच घूमजाव केले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कधीच केलेले नसून प्रसारमाध्यमांनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील कोणताही वादग्रस्त मुद्दा हा शांततेच्या मार्गानेच सोडविण्यावर शरीफ यांचा भर असल्याचे त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.