भाजप सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी न दवडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारला धारेवर धरले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बोलणं म्हणजे गुन्हा होऊ लागला आहे, अशी खोचक टीका केजरीवाल यांनी केली.

वकिलांच्या धुडगूस प्रकरणी अहवाल सादर

देशात सध्या सुरू असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वादाच्या प्रकरणावर ते बोलत होते. जर तुम्ही भाजपवाले असाल तर तुम्ही खून, बलात्कार किंवा हाणामारी काहीही करा तो गुन्हा ठरणार नाही, पण तुम्ही भाजप किंवा संघाविरोधात ब्र काढलात तर तो गुन्हा ठरू लागला आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही कोणतंही मत व्यक्त केलं तर तो देशद्रोह ठरतो, असेही केजरीवाल पुढे म्हणाले.

लोकशाही, देशद्रोह अन् सहिष्णुता!

पतियाळा न्यायालयाबाहेर कन्हैय्या कुमारला झालेल्या मारहाण प्रकरणावरही केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाला केजरीवालांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना दोषी ठरविले. केजरीवालांनी दिल्ली पोलिसांच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन देखील सादर केले आहे.