Himachal Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बिलासपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका बसवर दरड आणि असंख्य दगडांचा ढिगारा बसवर पडला. हा ढिगारा एवढा मोठा होता की त्यामध्ये संपूर्ण बस ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि १५ जणांचा मृत्यू झाला. अद्यापही अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

बिलासपूर जिल्ह्यात झालेल्या या घटनेत आणखी काही प्रवासी या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा अचानक डोंगरावरून मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड खाली कोसळले आणि बसवर येऊन आदळले. यामध्ये संपूर्ण बस दबली गेली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तीन जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. तसेच अद्यापही अडकलेल्या इतरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या घटनेबाबत इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना बिलासपूरचे उपायुक्त राहुल कुमार यांनी या घटनेची पुष्टी केली असून १५ जणांचा मृत्यू झाल्याचं आणि तिघांना वाचवण्यात यश आल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या बसमध्ये एकूण ३० पेक्षा जास्त लोक होते असं सांगितलं जात आहे. मात्र, नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, घटनास्थळावरील एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की एक जेसीबी घटनास्थळी मदतकार्य करत आहे. बसवरील ढिगारा जेसीबीच्या माध्यमातून उचलला जात असल्याचं दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये बसचा काही भाग तुटलेला दिसून येत आहे. पोलीस, अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरू आहे. तसेच घटनास्थळी काही वेळात हिमाचलचे मंत्री मुकेश अग्निहोत्री देखील पोहोचत आहेत.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी या दुःखद घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच सरकार या संपूर्ण घटनेच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहे. सुखविंदर सिंह सुखू यांनी म्हटलं की, “बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकाऱ्यांना त्यांची संपूर्ण यंत्रणा तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि संपूर्ण बचाव कार्याबद्दल क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहे.”