पीटीआय, इस्लामाबाद
‘भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष पुन्हा होण्याची शक्यता खूपच कमी आहे,’’ असे मत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी बुधवारी व्यक्त केले. पण, असा संघर्ष झाला, तर जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे आढ्यतेखोर वक्तव्य त्यांनी केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच तुर्की, इराण, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या देशांना भेट दिली. भारताबरोबर झालेल्या संघर्षात या देशांनी पाकिस्तानला मदत केली होती. त्यांचे आभार मानण्यासाठी शरीफ यांनी या देशाचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर दार यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी ते म्हणाले, ‘‘भविष्यात संघर्ष होईल, की नाही याबाबत मी भाकीत करू शकत नाही. पण, तशी शक्यता कमी आहे. सध्या युद्धविराम आहे आणि दोन्ही बाजूंनी सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नव्याने संघर्षाची शक्यता कमी आहे. मात्र, भारताने लष्करी संघर्षाला पुन्हा सुरुवात केली, तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानची भारताबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे. पण, त्यासाठी पाकिस्तान उतावीळ नाही. दहशतवाद, सिंधू जल करारासह इतर सर्व मुद्द्यांवर पाकिस्तानला सर्वसमावेषक चर्चा हवी आहे.’’ सिंधू जल करार स्थगित करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांत सहकार्य आवश्यक’

इस्लामाबाद : ‘‘भारत आणि पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांनी परस्पर सहकार्य केले, तर दक्षिण आशियामधील दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी होईल,’’ असे वक्तव्य ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने ही माहिती दिली. भारताबरोबर नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा मिळावा, यासाठी पाकिस्तानने अमेरिकेत शिष्टमंडळ पाठविले आहे. या शिष्टमंडळाचा भुट्टो हे भाग आहेत. ते म्हणाले, ‘पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि भारताची रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर संस्थांनी परस्पर सहकार्य केले, तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी होईल, याची मला खात्री आहे.’ दोन्ही देशांतील संघर्ष संपलेला नसून, आंतरराष्ट्रीय समुदायाने दक्षिण आशियात लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.