चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळला आहे. तर पाच राज्यांपैकी एकाही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. उलट हातचं पंजाब राज्यही आपकडे गेल्याने काँग्रेस आता देशात केवळ पाच राज्यांमध्ये सत्तेत आहे. असं असतानाच आता तृणमूल काँग्रेसकडून देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन करावं असा सल्ला देण्यात आलाय. मात्र भाजपाने टीएमसी म्हणजेच तृणमूलवर भाजपाचे एजंट असल्याचा आरोप या सल्ल्याला उत्तर देताना केलाय. भाजपानेही गोव्यातील निकालांच्या आधारे तृणमूलवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

टीएमसीचे नेते आणि पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी काँग्रेसला तृणमूलमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिलाय. “मला कळत नाहीय की काँग्रेससारख्या अशा जुन्या पक्षाचं असं का होतंय. आम्ही सुद्धा हा पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने आता तृणमूलमध्ये विलीन झालं पाहिजे. हीच योग्य वेळ आहे. असं झाल्यास राष्ट्रीय स्तरावर आपण महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांच्या सिद्धांतांच्या आधारे गोडसेंच्या सिद्धांतांविरोधात लढा देऊ शकू,” असं हाकिम यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी, “आम्ही बऱ्याच काळापासून सांगतोय की भाजपासारख्या पक्षाविरुद्ध काँग्रेस एकटी लढू शकत नाही. भाजपाविरोधात लढण्यासाठी आपल्याला ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांची गरज आहे. काँग्रेसला हे समजायला हवं,” असं म्हटलंय. “भाजपाच्याविरोधात विरोधकांची शक्तीशाली आघाडी तयार करण्याऐवजी काँग्रेस ट्विटर पुरती मर्यादीत राहिलीय,” असा आरोप यापूर्वी तृणमूलचं मुखपत्र असणाऱ्या ‘जागो बांग्ला’ या वृत्तपत्रातून करण्यात आलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरियो यांना पक्षामध्ये सहभागी करुन घेतल्यानंतरही काँग्रेसला फटका बसलाय. तृणमूललाही गोव्यामध्ये चमक दाखवता आली नाही. त्यांना एकाही जागेवर विजयम मिळवता आला नाही. टीएमसीसोबत युती करणाऱ्या महाराष्ट्र गोमांतक पार्टीला दोन जागांवर विजय मिळवला. मात्र या पक्षाने भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

पश्चिम बंगालचे काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीच्या विलीनकरणाच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिलीय. “टीएमसी भाजपाचा सर्वात मोठा एजंट आहे. ते भाजपाविरोधात लढण्यासाठी गंभीर असतील तर त्यांनीच काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करावा,” असं चौधरी म्हणालेत.