गेल्या वर्षभरापासून ज्या चित्रपटाची चर्चा चालू होती, तो The Kerala Story चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्यातील दाव्यांवरून राजकीय वर्तुळात आरोप केले जात आहेत. तसेच, दी केरला स्टोरीमधील दावे चुकीचे असल्याचा दावाही काही लोक करत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटातील दाव्यांना पाठिंबा दिला आहे. या सर्व मुद्द्यांवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरच्या राजवटीशी केली आहे. काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? कर्नाटकमधील एका प्रचारसभेत बोलताना मोदींनी दी केरला स्टोरीचं समर्थन केलं होतं. "असं म्हणतात केरला स्टोरी फक्त एकाच राज्यात झालेल्या दहशतवादी कारवायांवर आधारित आहे. देशातलं एवढं सुंदर राज्य, जिथले लोक कष्टाळू असतात, त्या केरळमधल्या दहशतवादी कारस्थानाचा खुलासा दी केरला स्टोरी चित्रपटात करण्यात आला आहे. देशाचं दुर्भाग्य हे आहे की काँग्रेस आज समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभी असल्याचं दिसत आहे", असं नरेंद्र मोदी या सभेत बोलताना म्हणाले होते. मोदींची हिटरलच्या राजवटीची तुलना! दरम्यान, मोदींच्या या भूमिकेला विरोध करताना ओवैसींनी थेट हिटलरच्या राजवटीचा उल्लेख केला आहे. "हिटलरनं ७० लाख ज्यू लोकांना ठार मारलं. गॅस चेंबरमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकलं. हे सगळं कुठून सुरू झालं? आपल्याला इतिहासातून शिकायला हवं. आधी हिटलरनं द्वेषपूर्ण भाषणांपासून सुरुवात केली. त्यानंतर त्यानं चित्रपट बनवायला सुरुवात केली. १९४० मध्ये पहिला चित्रपट तयार झाला इटर्नल ज्यू. त्यातून जर्मन लोकांमध्ये ज्यूंबद्दल द्वेष निर्माण केला. त्यानंतर ज्यूंचं शिरकाण सुरू झालं", असं ओवैसी टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले. व्हॉट्सअॅप स्टेटसवर ‘The Kerala Story’ चं कौतुक केलं म्हणून विहिंपच्या कार्यकर्त्याला मारहाण; गुन्हा दाखल! "नरेंद्र मोदी खूप मोठे अभिनेते" "पंतप्रधान कुठल्या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, स्क्रिप्टरायटर आहेत की देशाचे पंतप्रधान आहेत? ते कधीपासून चित्रपटाचं प्रमोशन करायला लागले? ते खूप मोठे अभिनेते आहेत हे माहिती आहे. ते बॉलिवुडमझ्ये अभिनय करत असते, तर फिल्मफेअर पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. आता आजकाल ते चित्रपटांचं प्रमोशन करत आहेत", अशा शब्दांत ओवैसींनी मोदींच्या भूमिकेवर टीकास्र सोडलं आहे. "हिटलरनं ज्यूंबाबत जे केलं, ते भारतात होऊ नये" हा चित्रपट असत्यावर आधारलेला आहे. आधी निर्माते म्हणाले की ३२ हजार मुलींचं धर्मांतरण झालं. हे निर्लज्ज लोक आहेत जे मुसलमानांना दाखवून त्यांचं पोट भरत आहेत. लाज वाटली पाहिजे या लोकांना. त्यांनी सत्य दाखवावं. मुस्लीम समाजातील सर्व धार्मिक संघटनांनी आयसिसचा निषेध केला आहे. त्यांनी सांगावं की हा चित्रपट फिक्शन आहे. मग काही हरकत नाही. यांचे सर्वात मोठे प्रमोटर देशाचे पंतप्रधान आहेत. इतिहासापासून देशानं धडा घेतला पाहिजे. हिटरलनं ज्यूंच्या बाबतीत जे केलं, ते इथे आपल्या देशात होऊ नये", अशी भीती ओवैसींनी यावेळी व्यक्त केली.