नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएनं बाजी मापली असली तरी या निवडणुकांमध्ये अनेक बदलही पाहालया मिळाले. बिहारमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवला. दरम्यान, बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली. ओवेसी यांनी एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केलं.

“पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचं आमचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. आमचा सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिलं. जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि प्रेम दिलं. आम्हाला पुढे अजूनही मेहनत करायची आहे,” असं ओवेसी म्हणाले. “आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीनं तुरूंगात टाकलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे. निर्णयापूर्वी आम्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा करू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- बिहारच्या निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश; जाणून घ्या काय होती ओवेसींची रणनीती?

बिहारचा मतदार गुलाम नाही

“बिहारमध्ये आम्ही यापूर्वी आरजेडीच्या लोकांशी बोलणी केली होती. आम्ही प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी काही मान्य केलं नाही. बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आभार. मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू असं जो पक्ष समजतो ते दिवस आता निघून गेले. तुम्हाला काम करावं लागेल आणि लोकांचं मनही जिंकावं लागेल,” असं ओवेसी म्हणाले.

आणखी वाचा- कोण आहे भाजपाचा सायलेंट व्होटर? नरेंद्र मोदींनी केला खुलासा; म्हणाले…

… यावर आक्षेप

“आम्हाला भाजपाची टीम बी म्हटलं जातं यावर आमचा आक्षेप आहे. आम्हाला टीम बी बनवा असं मी सांगतो. जेवढे आमच्यावर तुम्ही आरोप कराल तेवढाच आमचा आत्मविश्वास वाढेल. लोकांनी आमच्या पक्षाची साथ दिली आहे. जेव्हा मी १३ वर्षांचा होतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोकं आमच्या घरावर ओवेसी कब्रिस्तान या पाकिस्तान असं म्हणून पळून जायचे. आम्ही हे यापूर्वीपासून ऐकत आलो आहोत. आम्ही चांगलं काम करतोय म्हणूनच आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत,” असंही ओवेसी म्हणाले.