नवी दिल्ली: जगभरातील सर्वोत्तम ५० न्याहरीच्या पदार्थांच्या यादीत चटकदार मिसळीला स्थान मिळाले आहे. खाद्यापदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात ‘टेस्ट अटलास’ने न्याहरीची ही जागतिक क्रमवारी जाहीर केली. त्यात भारतीय प्रवेशिका १८ व्या स्थानी आहे.
या क्रमवारीत चवीपेक्षाही स्थानिक संस्कृतीशी जोडणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देण्यात आले. जगभरातील नागरिक दिवसाची सुरुवात या पदार्थाने करतात. जून २०२५ च्या क्रमवारीनुसार जगातील पहिल्या ५० पदार्थांमध्ये भारतातील तीन व्यंजने आहेत. यादीनुसार महाराष्ट्रातील मिसळ-पाव १८ व्या स्थानी आहे. तर पराठा २३ व्या व दिल्लीतील प्रसिद्ध असे छोले भटुरे ३२ व्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या शंभरमध्ये श्रीखंड
टेस्ट अटलासच्या शंभर पदार्थांच्या यादीत निहारी, श्रीखंड आणि पालक पनीरचा समावेश आहे.
मिसळीला दाद : महाराष्ट्रातील मिसळीला दाद देताना ‘अटलास’ने ती मसालेदार असायला हवी. तसेच कुरकुरीत खमंग मिसळ ही एखाद्या कलात्मक कामाप्रमाणे दिसते. त्यात अनेक रंग असतात, जसे की लाल, तपकिरी, नारिंगी तसेच हिरवा असे मिसळीचे वर्णन करत त्याची कृतीही दिली. यादीत देशातील पराठे आणि छोले भटुले हे अन्य दोन पदार्थ प्रामुख्याने उत्तर भारतातील आहेत. देशभरातील अन्य भागांतही ते तितकेच लोकप्रिय आहेत. छोले भटुरे हे दिल्ली परिसरात हमखास कोठेही उलब्ध होतात.