रशिया आणि युक्रेनमधील युद्धपरिस्थितीमुळे हजारो भारतीय नागरिक युद्धजन्य भागात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार मोदी सरकारचे चार मंत्री थेट युद्धजन्य युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये जाणार आहे. या सर्व मंत्र्यांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्याच्या मोहिमेत समन्वयक म्हणून नेमण्यात आलंय. यानुसार हे मंत्री भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली. यानंतर युक्रेनच्या सीमावर्ती देशात केंद्रीय मंत्र्यांनी जाऊन तेथील बचाव कार्याचा समन्वय करण्याचा निर्णय झाला. मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि व्ही. के. सिंह या चार मंत्र्यांचा यात समावेश आहे.
हेही वाचा : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रोमानिया आणि मोलदोव्हा, किरने रिजीजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, हरदीप पुरी यांच्याकडे हंगेरी आणि व्ही. के. सिंह यांच्याकडे पोलंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व मंत्री जबाबदारी दिलेल्या देशांमधील प्रशासनाच्या संपर्कात राहून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
युक्रेनमध्ये जवळपास १६ हजार भारतीय अडकले
रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारती नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे.
हेही वाचा : Ukraine War: “१५०-२०० भारतीयांना मायदेशी आणून मोदी सरकार…”; ‘ऑपरेशन गंगा’वरुन राऊतांचा टोला
युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. मूळची अमृतसरची असलेल्या एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी तळघरात आश्रय घेतल्याचे दिसत आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहाच्या तळघरात असून, ते खूप घाबरलेले दिसत आहेत. तर, युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.