लखनऊ : केंद्र सरकार शेतकऱ्यांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केला. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने आमच्याशी चर्चा करावी, अन्यथा आम्ही येथून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

किमान आधारभूत किमतीची हमी देणारा कायदा करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट उत्तर द्यावे असे सांगून, मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता याची टिकैत यांनी आठवण करून दिली.

‘त्यांना समजावून देण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागले. आम्ही आमच्या स्वत:च्या भाषेत आमचे मुद्दे त्यांना सांगितले, मात्र दिल्लीतील चकाकत्या बंगल्यांमध्ये बसलेल्यांची भाषा वेगळी होती’, असे आंदोलक शेतकरी संघटनांची शिखर संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महापंचायतीत बोलताना टिकैत म्हणाले.

‘हे कायदे अपायकारक असल्याचे त्यांना एका वर्षांने कळले व त्यांनी ते परत घेतले. कायदे मागे घेऊन त्यांनी योग्य तेच केले, मात्र काही लोकांना कायदे समजावून सांगण्यात आपण अपयशी ठरल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला. ते काही लोक आम्ही आहोत’, असेही टिकैत म्हणाले.