Man Killed by Wife Lover: काही महिन्यांपूर्वी मेरठ येथे घडलेलं सौरभ राजपूत-मुस्कान रस्तोगी प्रकरण आणि त्यानंतर आता चर्चेत असलेलं सोमन-राजा रघुवंशी प्रकरणाची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये झालेली पाहायला मिळत आहे. अलवर येथे एका पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकर आणि काही मारेकऱ्यांसह मिळून खून करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी जोडप्याचा नऊ वर्षीय मुलगा त्याचठिकाणी उपस्थित होता. मुलगा एकमेव साक्षीदार होता, त्याच्याच माहितीवरून आता हे प्रकरण उजेडात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खेरली गावात ७ जून रोजी मानसिंह जाटव यांचा खून करण्यात आला. जाटव यांची पत्नी, तिचा प्रियकर आणि काही भाडोत्री मारेकऱ्यांनी हा गुन्हा केला. मात्र खुनानंतर आरोपी पत्नी अनितानं प्रकृती खालावल्यामुळे जाटव यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र मुलाच्या साक्षीनंतर पुढच्या ४८ तासांतच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

मुलानं दिलेल्या जबाबानुसार, त्या रात्री मुलाच्या आईनं घराचा मुख्य दरवाजा जाणूनबुजून उघडाच ठेवला. त्यानंतर मध्यरात्री ‘काशी काका’ याच्यासह चार इसम घरात शिरले. काशी काका हा अनिताचा प्रियकर असून त्याचे नाव काशीराम प्रजापत असे असल्याचे समोर आले. या चार जणांनी जाटव यांची उशीने तोंड दाबून हत्या केली. यावेळी ९ वर्षीय मुलगा समोरच झोपल्याचं नाटक करत होता, त्याला हा प्रकार कळला.

“मला रात्री झोप आली होती. मात्र माझ्या आईने दरवाजा उघडल्याचा आवाज आला. काशी काका त्याच्यासह चार माणसं घेऊन आलेला मी पाहिलं. मी घाबरलो होतो म्हणून झोपेचं सोंग करू लागलो. ते सर्व आमच्या खोलीत आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना मारलं. हे सर्व करत असताना आई समोर उभी राहून पाहत होती. मी वडिलांना वाचविण्यासाठी उठलो, मात्र काशी काकांनी मला उचलून घेतलं आणि धमकी दिली. त्यामुळे घाबरून मी शांत बसलो. काही मिनिटांनंतर वडिलांचा मृत्यू होताच, ते सर्व लोक निघून गेले”, अशी साक्ष लहान मुलानं दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता आणि काशीराम यांनी जाटव यांचा खून करण्याची योजना आखली होती. अनिता आणि काशीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळं हा खून करण्यात आला आहे. अनिता खेरलीच्या बाजारपेठेत किरकोळ वस्तूंचे दुकान चालवते, तर काशीराम तिथेच कचोरी विकण्याचा गाडा चालवतो. गेल्या काही वर्षात त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिता आणि काशीराम यांनी भाडोत्री मारेकऱ्यांना हा खून करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाटव आजारपणातून मृत्यूमुखी पडले, असे भासविण्याचा अनिताचा प्रयत्न होता. पण त्यांच्या शरीरावरील जखमा पाहून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अनिता, काशीराम आणि एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.