विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केला जाणारा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी कायदा करण्याची मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये केली. काँग्रेस पक्ष यासाठी विविध संघटनांशी चर्चा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर विविध बहुजन संघटनांकडून दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर राहुल गांधी यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
ते म्हणाले, देशातील विद्यापीठात सध्या घडत असलेल्या घटनांमुळे देशाच्या भविष्याचे नुकसान होते आहे. रोहित आणि त्याच्या सोबतचे सहकारी देशाच्या भविष्याबद्दल बोलत होते. पण भाजप सरकारला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भविष्याबद्दल काहीही ऐकायची इच्छा नाही. ते अजूनही भूतकाळातच रमले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
रोहित वेमुला, जेएनयू प्रकरण, हरयाणामध्ये झालेले आंदोलन यावर सरकार काहीच बोलायला तयार नाही. ते फक्त योजनांवर बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली.