जनतेच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करीपर्यंत आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय पुढे रेटणे कठीण असल्याचे मत मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी व्यक्त केले आहे. अखेरचा चेंडू टाकण्यात येईपर्यंत कोणताही सामना संपत नाही, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
आंध्र प्रदेशातील जनभावनेबाबत काँग्रेसला अधिक संवेदनक्षम होण्याची गरज असल्याचे मतही रेड्डी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. विभाजनाचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. मात्र त्यासाठी घटनात्मक प्रक्रियेचा पाठपुरावा करावा लागेल. या प्रक्रियेत अनेक आंदोलने पुकारण्यात येतील. त्यामुळे निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी या सर्व बाबींचा सारासार विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या एखादा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याला जनता आणि राजकीय नेत्यांकडून विरोध होत आहे. विभाजनाचा निर्णय घ्यावयाचाच असल्यास या बाबींवर मात कशी करणार, निर्णय पुढे रेटून न्यावयाचा नसल्यास काय करणार, सर्व प्रदेशातील जनतेची समजूत कशी काढणार, हेच सरकार आणि पक्षापुढील प्रश्न आहेत, असेही ते म्हणाले.