नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. बलात्कार करणाऱ्या इसमाने तिचा गळा चिरला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. ही मुलगी अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा शोध घेणाऱ्या आईलाच ती सापडली. त्या अवस्थेतही तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे पाच तास बेडच मिळाला नाही. अखेर या मुलीचा मृत्यू झाला.
कुठे घडली ही धक्कादायक घटना?
नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची ही घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमधली आहे. पाटणा या ठिकाणी तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिला उपचारांसाठी पाच तास वाट बघावी लागली कारण तितका वेळ तिला बेडच मिळाला नाही. बेड मिळाल्यानंतर तिच्यावर पाच तसांनी उपचार सुरु झाले. अखेर दुसऱ्या दिवशी उपचारांच्या दरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर या घटनेने बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या शेजारी राहणारा आरोपी रोहीत हा आरोपी मासे विक्री करतो. ही मुलगीही त्याला कधी कधी मदत करत असे. त्याने तिला एकांत असलेल्या ठिकाणी नेलं. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा गळा चिरला. मुलगी घरात नाही म्हटल्यावर तिची आई तिचा शोध घेऊ लागली. रोहीत आणि ती मुलगी सायकलवरुन गेले होते असं काही शेजाऱ्यांनी तिच्या आईला सांगितलं. ज्यानंतर रोहीतला पकडण्यात आलं. त्याने त्या मुलीला कुठे नेलं ते सांगितलं. तिथे या मुलीची आई जेव्हा गेली तेव्हा ही मुलगी अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.
आईने मुलीला रुग्णालयात नेलं पण..
मुलीची अशी अवस्था पाहून आईने तिला तातडीने रुग्णालयात नेलं. पण तिथे तिला दाखल करुन घेण्यासाठी पाच तास वाट बघावी लागली कारण त्या रुग्णालयात बेडच मिळाला नाही, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. दरम्यान रुग्णालयाने आम्ही आमच्याकडून सगळी काळजी घेतली होती आणि व्यवस्थित उपचारही केले होते असं म्हणत पीडितेच्या कुटुंबाचे आरोप फेटाळले आहेत.
राहुल गांधींची बिहार सरकारवर टीका
या प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर टीका केली आहे. एका चिमुरड्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला तरीही तिला उपचारांसाठी दाखल करुन घ्यायला पाच तास लागले ही बाब बिहार सरकारसाठी लाज आणणारी आहे. बिहार सरकारने मुलींच्या सुरक्षेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आहे अशीही टीका राहुल गांधींनी केली आहे. तसंच या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली आहे.