देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी करोनाचं संकट काही टळलेलं नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी गेल्या महिन्यात काही सूचना दिल्या आहेत. त्यात १०० पैकी २३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

निती आयोगाने यापूर्वीही सप्टेंबर २०२० मध्ये दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधला होता. मात्र आता बांधलेला अंदाज अधिक जास्त असल्याचं दिसत आहे. गंभीर आणि मध्यम लक्षणं असलेल्या जवळपास २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल, असंही सांगितलं आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी आधारित पॅटर्नवर हॉस्पिटल बेड बाजूला ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. “कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. एका दिवसात ४ ते ५ लाख करोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहीजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड (त्यापैकी ५ लाख ऑक्सिजन बेड) आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड असावेत.”, अशा सूचना निती आयोगाने दिल्या आहेत. दुसऱ्या लाटेवळी म्हणजेच १ जूनला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख होती. तेव्हा २१.७४ टक्के रुग्णांना १० राज्यातील रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. यापैकी २.२ टक्के रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आलं होतं.

COVID 19 : देशभरात २४ तासात ४०३ रूग्णांचा मृत्यू ; ३८ हजार ४८७ जण करोनामुक्त!

सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेचा अंदाज काही महिन्यापूर्वी वर्तवण्यात आला होता. तेव्हा १०० पैकी २० करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्यापैकी तीन जणांना आयसीयूत भरती करावं लागेल. तसेच लक्षणं नसलेल्या ५० जणांना सात दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवावं लागेत. तसेच उर्वरित करोना रुग्णांना घरी ठेवावं लागेल, अशा सूचना दिल्या होत्या. हा सर्व अंदाज करोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड रुग्णालयं आणि बेडच्या वापरावर आधारित होता. पहिल्या लाटेदरम्यान १०० पैकी २० जणांना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी २.४३ लोकांना आयसीयूची आवश्यकता भासली होती. ८० जणांना विलगीकरणात ठेवणयात आलं होतं आणि त्यापैकी ५५ जणांना कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. आता दुसऱ्या लाटेनंतर अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे.