भारतीय सैन्याच्या उरी येथील लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय असलेल्या दोन पाकिस्तानी शाळकरी मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांनी उरी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या दोघांविरोधात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत, असे न्यायालयाला सांगितल्याने त्यांची सुटका करण्यात आली. फैसल हुसेन अवान आणि एहसान खुर्शिद यांना डिसेंबर महिन्यात भारताच्या हद्दीत पकडण्यात आले होते. मात्र, या दोघांचे पालक आणि शाळेच्या मुख्याधापकांनी हे दोघेजण रस्ता चुकल्यामुळे नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत आल्याचा दावा केला होता.सुरूवातीला या दोघांनी उरी येथील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुली दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरच्या तपासात असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
फैसल हुसेन अवान हा पाकिस्तानच्या कुमी कोटे तर त्याचा मित्र एहसान खुर्शिद हा मुझफ्फराबाद येथे राहणारे आहेत. उरी हल्ल्यानंतर २१ सप्टेंबरला या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. फैसल आणि एहसान राहत असलेली गावे नियंत्रण रेषेपासून चालत गेल्यास तासभराच्या अंतरावर आहेत. उरी हल्ल्याच्यावेळी म्हणजे १७ सप्टेंबरला फैसल घरीच असल्याचा दावा त्याचा भाऊ गुलाम तब्बसुम केला होता. उरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस यंत्रांनुसार दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून आल्याचे स्पष्ट झाले होते. आम्हाला या माध्यमातून कोणताही वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळेच मी आतापर्यंत मीडियाकडे गेलो नव्हतो. मात्र, एक मोठा भाऊ म्हणून फैसलचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. सध्या मला काय करावे हे समजेनानसे झाले आहे. भारतामधील कोणत्यातरी शक्तिशाली व्यक्तीला ही गोष्ट समजावी आणि त्यांनी दोन्ही मुलांना परत घरी पाठवावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे गुलाम तब्बसुम याने म्हटले होते. तर दुसरीकडे फैसल शिकत असलेल्या मुझफ्फराबादमधील शाळेचे मुख्याधापक बशरत हुसैन यांनीदेखील फैसल एक चांगला , हुशार आणि मनमिळाऊ विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. तो दररोज सहा तास शाळेत असायचा, असे हुसैन यांनी सांगितले. दरम्यान, शाळेच्या नोंदीप्रमाणे फैसल व एहसान या दोघांचेही वय १६ इतके आहे.घटनास्थळी करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारावर या दोघांना ताब्यात घेऊन एनआयएच्या ताब्यात सोपविण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार अशाप्रकारे रस्ता चुकून नियंत्रण रेषा ओलांडण्याचे प्रकार कधीकधी घडतात. गेल्या पाच वर्षात अशाप्रकारची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत.