भाजपशी काडीमोडी घेतल्यानंतर, जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची महाआघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर ते सध्या विविध विरोधीपक्ष नेत्यांच्या झंझावाती गाठीभेटी घेत आहेत. त्यांनी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर डाव्या आघाडीच्या नेत्यांशी देखील त्यांच्या भेटी झाल्या आहेत. आता ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील भेट घेणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे.

“सोनिया गांधी परदेशातून आल्यावर मी त्यांना भेटेन. गरज पडल्यास आम्ही (विरोधी पक्षनेते) पुन्हा भेटू. सर्वांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. आम्हाला तिसरी आघाडी नव्हे तर मुख्य आघाडी हवी आहे. विरोधकांना एकत्र करण्याचे काम मी सुरूच ठेवणार आहे.” असं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस, प्रादेशिक पक्ष आणि डावे पक्ष यांची एकजूट महत्त्वाची असून विरोधक एकत्र आले तर, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ५० जागांपर्यंत सीमित होईल, असा आशावाद नितीश कुमार यांनी मंगळवारी व्यक्त केला होता. याचबरोबर नितीशकुमार यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. ‘‘काँग्रेस व डाव्या पक्षांची मदत घेतल्याशिवाय विरोधकांची महाआघाडी होऊ शकत नाही’’, असे विधानही त्यांनी केले.

नितीश कुमारांनी भाजपाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

तसेच नितीश कुमार यांनी मंगळवारी, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे महासचिव डी. राजा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, मेदांत रुग्णालयात जाऊन सपचे नेता मुलायम सिंह यादव तसेच, अखिलेश यादव यांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल यांच्याशीही नितीशकुमार यांनी सुमारे ९० मिनिटे चर्चा केली.