Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर काल भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्थ केले आहेत. यानंतर पाकिस्ताने सैन्याने भारताच्या सीमेवर केलेल्या गोळीबारात सुमारे १५ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
अशात आत ७-८ मे च्या मध्यरात्री पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केल्याचे वृत्त, एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान या घुसखोराची ओळख अद्याप पटलेली नाही.
फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोर जाणूनबुजून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना आणि अंधाराचा फायदा घेत सीमा सुरक्षा कुंपणाकडे जाताना दिसला. त्यानंतर सतर्क बीएसएफ जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. दिवस उजाडल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे पूंछमध्ये सुमारे १५ नागरिकांनी आपले प्राण गमावले तर एकूण ५९ लोक जखमी झाले आहेत. यापैकी ४४ जण जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या बाह्य प्रचार आणि सार्वजनिक राजनैतिक विभागाने ही माहिती दिली.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. पुढे ८ मे रोजीही रात्री नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या छोट्या शस्त्रांच्या आणि तोफांच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमधील विरुद्ध भागात तसेच उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला होता.
२५-२६ एप्रिलच्या रात्रीपासून पाकिस्तानने कोणत्याही कारणाशिवाय सातत्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील नागरी भागांना लक्ष्य करून शस्त्रसंधी उल्लंघनाची मालिका सुरूच केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माम झाले आहे.
दरम्यान भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला जगभरातील अनेक देशातील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. याचबरोबर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जगातिल विविध नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे.