India Pakistan War Operation Sindoor Updates: पंजाबमधील पठाणकोट सेक्टरमध्ये काल रात्री भारतीय हवाई दलाच्या संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान पाडले आहे. तत्पूर्वी, संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकीदरम्यान ही घटना घडली. याबाबत शुक्रवारी अनेक सूत्रांनी एएनआयला माहिती दिली आहे. दरम्यान याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला यशस्वीरित्या प्रत्युत्तर दिले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने म्हटले की, “जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. भारतीय सशस्त्र दलांनी या पाकिस्तानी हल्ल्याचा धोका निष्प्रभ केला.”

अमित शहा यांची सर्व सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांसोबत बैठक

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांसोबत भारताच्या सीमेवरील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

पाकिस्तानने जम्मू आणि राजस्थानसह भारतीय प्रदेशांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याच्या तयारीचे मूल्यांकन करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. लक्ष्यित क्षेत्रांमध्ये सतवारी, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि जैसलमेर यांचा समावेश होता. येणाऱ्या सर्व क्षेपणास्त्रांना भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी रोखले आणि कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

एका वेगळ्या बैठकीत, गृहमंत्र्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकांसोबत भारतातील विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेतला, कारण प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी अतिदक्षता वाढवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने ७ मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” लाँच केल्यानंतर या घटना घडल्या आहेत. या कारवाईचा एक भाग म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.