जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस तिसऱया किंवा चौथ्या स्थानावर फेकला गेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या जागांमध्ये आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे स्पष्ट करीत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी कॉंग्रेसमुक्त भारत अभियान यशस्वीपणे सुरू असल्याचा टोमणा मारला.
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहा यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या दोन्ही राज्यातील मतदारांचे आभार मानले. झारखंडमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे चित्र असून, जम्मू-काश्मीरमध्ये हा पक्ष दुसऱया स्थानावर राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही यश मिळवले आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला. हरियाणामध्ये आमच्या जागा चार वरून ५० पर्यंत जाऊन पोहोचल्या. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच स्वबळावर भाजप तिथे सरकार स्थापन करणार आहे. काश्मीरमध्येही गेल्यावेळच्या निवडणुकीच्या तुलनेत आमच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, या चारही राज्यांमध्ये कॉंग्रेस तिसऱया किंवा चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. झारखंडमध्ये विरोधकांना दोन अंकी जागाही मिळालेल्या नाहीत.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेले काम, लोकांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा यांचा पक्षाच्या विजयात मोठे योगदान आहे. मोदींमुळेच हे यश मिळाल्याचे सांगून शहा म्हणाले, पूर्ण बहुमत असलेले सरकारच विकास करू शकते, असे वचन आम्ही झारखंडमधील जनतेला दिले होते. ते आम्ही पाळणार आहे. झारखंडमध्ये चांगले सरकार आम्ही देणार आहोत. काश्मीरमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी पीडीपीच्या तुलनेत जास्त आहे. या ठिकाणी भाजपला २३.४ टक्के तर पीडीपीला २२ टक्के मते मिळाली आहेत.