इस्लामाबाद : भारताने केलेल्या लष्करी कारवाईनंतर भेदरलेल्या पाकिस्तानने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात संरक्षणासाठीच्या तरतुदीत २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. संरक्षण खर्चासाठी ९ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी पाकिस्तानने इतर सर्व महत्त्वाच्या खर्चांमध्ये कपात केली आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब नॅशनल असेंब्लीमध्ये मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला.
अंदाजपत्रकात तरतुदींचा कोणताही उल्लेख नाही. कारण संसदेत याबाबत चर्चा होत नाही. अर्थमंत्र्यांनी अंदाजपत्रक सादर करताना भाषणात भारताबरोबरच्या तणावाचा उल्लेख केला. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक वेळी सादर होत असून, देशाने एकता दाखविल्याचे त्यांनी भाषणात नमूद केले. पहलगाममध्ये २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन देशांदरम्यान तणाव वाढला. भारताने सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये पाकव्यात काश्मीर आणि दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले होते. यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.
पाकिस्तानची मदत थांबवा-राजनाथ सिंह
आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला मदत देणे थांबवावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. अगतिक दहशतवादाचे पाकिस्तान हे उगमस्थान आहे. त्यांना बळ देऊ नये असे नमूद करत, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत एका समितीचे उपाध्यक्षपद देणे धक्कादायक असल्याचे स्पष्ट केले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, तर पाकिस्तान दहशतवाद्यांचा पाठीराखा म्हणून ओळखला जात असल्याचे सिंह यांनी डेहराडून येथील कार्यक्रमात स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय समुदायाने त्या देशावर दबाव आणण्याची गरजही व्यक्त केली.