नवी दिल्ली : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तान भारताविरोधात खेळत असलेला दहशतवादाचा धोकादायक खेळ संपला आहे, हे पाकिस्तानने स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे,’ असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केले. संरक्षणमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौदलाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू नौकेवर त्यांनी नौसैनिकांशी संवाद साधला.
‘दहशतवादाविरुद्ध पाकिस्तान कल्पनाही करू शकणार नाही, अशा पद्धतींचाही वापर करण्यास भारत कचरणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ लष्करी कारवाई नसून, दहशतवादाविरुद्ध भारताने केलेला थेट हल्ला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर जोपासला जाणारा दहशतवाद पाकिस्तानने उखडून टाकणे, हे त्यांच्याच हिताचे आहे.’
‘पाकिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी कृत्ये खुलीपणाने होतात. दहशतवाद्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई भारत करू शकतो. ही कारवाई मग सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे, समुद्रामध्ये असो. दहशतवादाविरुद्ध नागरिकांची सुरक्षा करण्याचा भारताचा हक्क आज जग मान्य करीत आहे. जगातील कुठलीही शक्ती भारताला हे करण्यापासून रोखू शकत नाही,’ असे संरक्षणमंत्री म्हणाले.
नौदलाचे कौतुक
नौदल शांतपणे बजावत असलेल्या कर्तव्याने प्रत्येक भारतीय भारावून गेला आहे. शांत राहूनही पाकिस्तानी लष्कराला नौदलाने हलू दिले नाही. नौदल अरबी समुद्रात आक्रमक स्वरुपात तैनात होते. आपला हल्ला इतका शक्तिशाली होता, की पाकिस्तान साऱ्या जगाकडे भारताला थांबविण्याची विनंती करण्यासाठी गेला, असे सिंह म्हणाले.