१९९३च्या बॉम्बस्फोटांमध्ये पाकिस्तानचा हात होता, हे अगदी स्पष्ट असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निकाल देताना नोंदविले. या खटल्यातील जवळपास सर्व आरोपींनी आपल्याला पाकिस्तानातील आयएसआयने प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बॉम्बस्फोटात हात होता, हे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला अंतिम निकाल दिला. न्या. पी. सत्त्वशिवम् आणि बी.एस. चौहान यांच्या खंडपीठाने निकाल दिला. न्यायालयाने या खटल्यातील प्रमुख दोषी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्याचबरोबर बॉम्बस्फोटातील अन्य दहा दोषींची शिक्षा फाशीवरून जन्मठेप करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. तांत्रिक कारणामुळे सादर केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या. २० दोषींपैकी १७ जणांची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली.
सीमाशुल्क खात्यावर ताशेरे
न्यायालयाने सीमाशुल्क खात्याच्या अधिकाऱयांवरही ताशेरे ओढले आहेत. सीमाशुल्क खात्याच्या अधिकाऱयांनी आपले काम बेजबाबदारीने केल्यास त्यामुळे केवळ देशाला आर्थिक फटका बसत नसून, देशातील नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होतो, हे १९९३च्या बॉम्बस्फोटावरून स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.