महिला आरक्षणाचा मुद्दा आज लोकसभेत चर्चिला जातो आहे. आज विविध पक्षाचे खासदार मग ते विरोधी पक्षाचे असोत किंवा सत्ताधारी पक्षाचे या विषयावर आपली भूमिका मांडत आहेत. आज सोनिया गांधी यांनी त्वरित आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. तसंच हे आरक्षण हे राजीव गांधी यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींचं उदाहरण देत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या स्मृती इराणी

महिला आरक्षण विधेयक सादर होणं ही देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होती. एक नवा संकल्प घेऊन आपण नव्या लोकसभेत प्रवेश केला आहे. त्या दिवशी ही बाब होणं महत्त्वाचं होतं कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण नव्या संसदेत प्रवेश केला. आपल्याकडे ही प्रथा आहे जेव्हा आपण नव्या घरात प्रवेश करतो तेव्हा सर्वात आधी गृहलक्ष्मीची पूजा होते. अनेक घरांवर आपल्याला गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे दिसतात. तर काही घरांमध्ये आपल्याला लक्ष्मीची पावलंही दिसतात. प्रधानसेवक मोदींनी जे विधेयक आणलं आहे ते नव्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो त्याचप्रमाणे आहे असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.

आपला देश स्वतंत्र झाला तेव्हाही महिलांची मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या. आज काही महानुभवांनी अटलबिहारी वाजपेयी आणि देवेगौडा यांचीही नावं घेतली. मी त्यांचे अभिनंदन करते. तसंच राजनाथ सिंह यांच्या समितीत मी देखील होते, सुषमा स्वराज होत्या, सुमित्रा महाजन होत्या, नजमा हेपतुल्ला होत्या असंही त्या म्हणाल्या. मी या सगळ्यांचं अभिनंदन करते असंही स्मृती इराणी म्हणाल्या.

काँग्रेसवर हल्लाबोल

यशाचे अनेक बाप असतात आणि अपयशाला कुणीही विचारत नाही अशी एक म्हण आहे. त्यालाच अनुसरुन मी सांगू इच्छिते की जेव्हा हे विधेयक संसदेत आणलं गेलं तेव्हा काही लोक म्हणाले की हे आमचंच विधेयक आहे. काही म्हणाले आम्ही चिठ्ठी लिहिली, त्यानंतर काहीजणांनी म्हटलं आहे या विधेयकाचा संवैधानिक मसुदा आमचाच आहे. आज सभागृहातल्या एक सन्मानीय नेत्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. त्यांचे मी विशेष आभार मानते. कारण आत्तापर्यंत आम्हाला हे सांगितलं गेलं की एका कुटुंबाने ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती केली. आजपर्यंत हेच सांगितलं गेलं. मात्र आज त्यांनी हे मान्य केलं की ही घटनादुरुस्ती नरसिंह राव सरकारने केली. दुसरी मागणी ते करत आहेत की त्वरित अमलबजावणी का करत नाही. मी आज ती प्रत आणली आहे ज्याला हे आमचं बिल आहे म्हणतात. काँग्रेस पक्ष म्हणतो की हे बिल राज्यसभेत पास झालं आणि मग लोकसभेत टिकलं नाही.

त्यावेळी सोनिया गांधी काय म्हणाल्या होत्या?

युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या बिलाच्या ३ बी मध्ये म्हणतात की शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईबसाठी तिसऱ्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये जागा राखीव नसतील. आजचं सरकार हे जेव्हा कायदा येईल तेव्हा १५ वर्षे महिलांना आरक्षण ही मोदींची गॅरंटी आहे. मात्र काँग्रेसने २ बी आणि ३ बीने पंधरा वर्षांची तरतूद नाही. दहा वर्षे महिलांनी मेहनत करावी मात्र त्यानंतर तुमचा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेऊ हे त्या प्रस्तावात होतं. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करते ज्यांनी काँग्रेसची ही इच्छा धुळीस मिळवली. त्यांचं (काँग्रेस) आता हे म्हणणं आहे त्वरित आरक्षण का देत नाही? घटनेची हेटाळणी करणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे. मात्र संविधानाच्या अनुच्छेद ८२ वाचलं तर त्यात हे लिहिलं आहे की जनगणना झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात. विरोधी पक्षांना घटनेचा अपमान करायचा आहे का? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आता हे विचारलं जातं आहे की तुम्ही ओबीसी आणि मुस्लिमांना आरक्षण का देत नाही? माझ्यापेक्षा अनुभवी लोक जे माईकशिवाय आणि कुठल्याही संमती शिवाय दातओठ खाऊन बोलत आहेत त्यांना बहुदा हे माहित नाही की संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण दिलंच जात नाही. त्यामुळे मी आज या माध्यमातून ही आग्रही भूमिका घेते आहे की आज आपण त्या भारतात राहतो आहोत जिथे व्यवस्था डिजिटल रुपाने पोहचली आहे. आपल्या देशाचे लोक ज्याप्रकारे विरोधी पक्ष भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या भ्रमात त्यांनी फसू नये असं मी सांगू इच्छिते.