भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द झाल्याच्या वृत्ताचा सोमवारी इन्कार केला. १५ जानेवारीला होणारी भारत-पाक चर्चा रद्द झाल्याचे विधान दोवल यांनी मुलाखतीदरम्यान केल्याचा दावा सोमवारी ‘दैनिक भास्कर’ या वृत्तपत्राकडून करण्यात आला होता. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून समाधानकारक तपास झाल्याशिवाय भारत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही, असे दोवल यांनी या मुलाखतीत म्हटले होते. मात्र, दोवल यांनी लगेचच खुलासा करत मी चर्चा रद्द झाली, असे म्हणालो नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्यासंदर्भात कारवाई केल्यासच आम्ही चर्चा करू, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. ‘दैनिक भास्कर’च्या दाव्याप्रमाणे दोवल यांनी मुलाखतीत १५ जानेवारी रोजी लाहोर येथे होणारी उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते. पठाणकोट हल्ल्यांनंतर मागील आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांना भारत-पाक चर्चेसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले होते की, सध्याची परिस्थिती पाहता आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे. आता पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यानंतर पाकिस्तान काय कारवाई करणार, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्वरूप यांनी सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2016 रोजी प्रकाशित
पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चा फिसकटल्याच्या वृत्ताचा दोवल यांच्याकडून इन्कार
पाकिस्तानकडून समाधानकारक तपास झाल्याशिवाय भारत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 11-01-2016 at 12:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathankot attack nsa ajit doval denies saying talks with pakistan cancelled