रायगड लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पाठिंबा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे संतप्त झालेले शेकाप नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता’चे अलिबागमधील प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.

रायगड आणि मावळ या दोन मतदारसंघात शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. शेकापच्या पाठिंब्यानंतरही रायगडमध्ये राष्ट्रवादीचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. शेकापची अडीच लाख मतं गेली कुठं, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत विचारणा करताच संतापलेल्या जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे अलिबागचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्यावर भ्याड हल्ला केला. जयंत पाटील यांनी कशाळकर यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार मतमोजणी केंद्रात पोलिसांसमोरच घडला. काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय, असे म्हणत त्यांनी कशाळकर यांना मारहाण केली. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.