PM Modi warning to pakiistan Speech on Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले होते. या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून जवळपास १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतात अनेक ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर एकमत झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. भारताने दहशतवादाविरोधातील कारवाई फक्त स्थगित केलीय असं मोदी म्हणाले आहेत.
“दहशतवाद्यांनी आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यामुळे भारताने दहशतवाद्याचे तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवादाचे अनेक म्होरके खुलेपणाने पाकिस्तानात फिरत होते. जे भारताविरोधात कट रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात त्यांचा खात्मा केला,” असे पंतप्रधान नरेंद्र मोद म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या गर्तेत गेला होता. गडबडा होता. याच गोंधळात त्यानं आणखी एक चूक केली. दहशतवादविरोधी कारवाईत भारताची मदत करण्याऐवजी भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिरं, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगानं पाहिलं की कशा प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं भारतासमोर निष्प्रभ झाले. भारताच्या सक्षम एअर डिफेन्स सिस्टीमनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं. पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. पण भारतानं पाकिस्तानच्या छातीवरच वार केला. भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तानी वायूदलाच्या तळांना लक्ष्य केलं. या तळांवर पाकिस्तानला मोठा गर्व होता. भारतानं पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला एवढं उद्ध्वस्त केलं, ज्याचा अंदाज पाकिस्तानलाही नव्हता. त्यामुळे भारताच्या आक्रमक मोहिमेनंतर पाकिस्तान वाचण्याचे मार्ग शोधू लागला. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी देशांकडे साकडं घालू लागला. सगळीकडे अपयशी ठरल्यानंतर नाईलाजाने १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी लष्करानं आपल्या डीजीएमओंना संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवादी व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं होतं. दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.”
” पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानकडून जेव्हा हे म्हटलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी कारवाई केली जाणार नाही. तेव्हा भारतानंही त्यावर विचार केला,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कारवाई फक्त स्थगित केलीय…
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, “मी पुन्हा सांगतो, आपण पाकिस्तानच्या दहशतवादी व लष्करी तळांवरील आपली कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत आपण पाकिस्तानच्या हालचाली या निकषांवर पाहू की ते काय पाऊल उचलतात. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी, एअर फोर्स, आर्मी आणि नौदलानं, आपली बीएसएफ, निमलष्करी दल सातत्याने सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादविरोधातील लढ्यात एक नवी रेषा, नवी पद्धत निश्चित केली आहे.”
भारताचं दहशतवादाविरोधातील धोरण ही नवी पद्धत कशी असेल याबद्दल विस्तारानं बोलताना मोदी म्हणाले की, “पहिला – भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देणारच. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई केली जाईल, जिथे दहशतवादाची मुळं आहेत. दुसरा – कोणतंही आण्विक ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्याचा आधार घेऊन वाढणाऱ्या दहशतवादावर भारत घातक हल्ला करणार. तिसरा – आपण दहशतवाद्यांचे सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळे मानणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगानं पाकिस्तानचं ते निंदनीय सत्य पाहिलं आहे जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे मोठमोठे अधिकारी उपस्थित होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. आपण भारत आणि भारतीय नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू,” असेही मोदी यावेळी म्हणाले.