भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत हे मागील एक ते दीड वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व टिकैत यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळेच सरकारने हे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. भारतीय शेतकऱ्यांचे नेते म्हणून टिकैत हे भारताबरोबरच आता भारताबाहेरही ओळखले जातात. अनेक कार्यक्रमांमधून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय.

टिकैत हे सोमवारी आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: पंतप्रधानांसोबत फिरणाऱ्या SPG Security वरील एका दिवसाच्या खर्चाचा आकडा पाहिलात का?

टिकैत यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारणारी महिला पत्रकार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्यावर टिकैत यांनी, “योगीजी पंतप्रधान होणे हे तुम्हाला योग्य वाटत नाही का?,” असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अँकरने मोदी राष्ट्रपती बननणार तर आताच्या राष्ट्रपतींचं काय?, असा प्रश्न टिकैत यांना विचारला. “ते किती माहिने आहेत?, काही महिने त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे,” असं उत्तर टिकैत यांनी दिलं.

नक्की वाचा >> जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली पण २० कोटी…”

टिकैत यांनी ज्या पद्धतीने ही वक्तव्य केली त्यावरुन त्यांनी उपहासात्मक पद्धतीने योगींनाच पंतप्रधान करावं असा निशाणा साधल्याचं दिसून आलं. अगदी हसत हसत ते या प्रश्नांची उत्तर देत होती. योगी हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का या प्रश्नावरुन त्यांनी प्रसारमाध्यमांचीच फिरकी घेत त्यांना थेट पंतप्रधान बनवा अशी इच्छा व्यक्त केली. टिकैत यांचं हे उत्तर ऐकून महिला अँकरने, “टिकैत हे पूर्णपणे राजकीय नेते झाले आहेत. त्यांची वक्तव्यही तशीच आहेत. पण त्यांना राजकारण करायचंय नाहीय असं ते सांगतात,” असं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशसाठी कोणतं सरकार चांगलं असेल असा प्रश्न विचारण्यात आला असता टिकैत यांनी, आंदोलन सक्षम असेल तर येणारं सरकार कोणतंही असलं तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.