पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं लढाई देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी देशातील विविध भागात कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लोकांच्या मनातील काही शंका उपस्थित केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांची करोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं जाणून घेतली. त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. यावेळी डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्या विचारातील स्पष्टता मला आवडली. आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं. करोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी?,’ असा प्रश्न मोदींनी केला. त्याला उत्तर देताना शशांक जोशी म्हणाले,”दुसरी लाट खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी करोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोकं घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो,” असं शशांक जोशी म्हणाले.

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुसरा प्रश्न विचारला. ‘मला अनेक पत्र मिळाली आहेत. उपचारांविषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. काही औषधांची मागणीही खूप होतेय. त्यामुळे माझी इच्छा आहे की, करोनाच्या उपचाराविषयीही आपण लोकांना माहिती द्यावी,’ असं मोदी म्हणाले. त्यावर जोशी म्हणाले,”करोनाचा उपचार लोक खूप उशिराने सुरू करतात. आजार अंगावर काढतात. त्याचबरोबर मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात. लोकांनी सरकारच्या सूचनांचं पालन केलं, तर कठिण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत नाही. करोनावर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. हलका, मध्यम आणि तीव्र करोना … हलका स्वरूपातील लक्षणं असलेल्यांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध्यम व तीव्र करोना असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. स्वस्तातील औषधं उपलब्ध आहेत. मात्र, सध्या चाचण्यांमध्ये असलेल्या रेमडेसिवीरची चर्चा होत आहे. यामुळे एक गोष्ट होते की रुग्णाला रुग्णालयात दोन तीन दिवस कमी राहावं लागतं. तब्येत सुधारण्यास मदत होते. पण, सुरूवातीच्या दिवसांमध्ये हे औषध दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधरण्यास मदत होते. लोकांनी व्हॉट्सअपवरील माहिती विश्वासू ठेवू नये. लोकांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. महागड्या औषधांमागे लागण्यात काही अर्थ नाही. काही भ्रम लोकांमध्ये तयार झालेले आहेत,” असं शशांक म्हणाले. या माहितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi mann ki baat dr shashank joshi maharashtra covid task force members bmh
First published on: 25-04-2021 at 11:33 IST