पीटीआय, जम्मू
घराणेशाहीच्या राजकारणाने जम्मू आणि काश्मीर या सुंदर प्रदेशाचे नुकसान झाले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दोडा येथील प्रचारसभेत केला. जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मोदी यांची ही पहिलीच प्रचारसभा आहे. यावेळी त्यांनी जम्मू व काश्मीरमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि काँग्रेसला लक्ष्य केले. तसेच जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचेही मोदी म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील घराणेशाहीला पर्याय म्हणून भाजपने नवीन नेतृत्व दिले आहे, असे मोदी म्हणाले. जम्मू विभागातील दोडामधील भाजपच्या उमेदवारासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभेत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले. घराणेशाहीच्या राजकारणामुळेच जम्मू व काश्मीरचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस हा सर्वात अप्रामाणिक पक्ष असून सत्तेवर येण्यासाठी ते निवडणुकांमध्ये गैरप्रकार करतात, असा आरोप मोदींनी या सभेत केला. तसेच निवडणुकीनंतर जम्मू व काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा : Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

मोदींनी सुरक्षेवर बोलावे ओमर

श्रीनगर : पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीचे जुनेच आरोप करण्याऐवजी जम्मू व काश्मीरमधील ढासळत्या सुरक्षे व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे, अशी टीका एनसीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली. भाजपला कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर आघाडी करण्यात काहीही गैर वाटत नाही असे ते म्हणाले. तसेच किश्तवारमधील जवानांच्या वीरमरणावर पंतप्रधानांनी मौन बाळगल्याबद्दल ओमर यांनी टीका केली.

हेही वाचा : PM Narendra Modi on Nehru : “आरक्षणातून नोकऱ्या दिल्या तर सरकारी सेवांचा दर्जा खालावेल, असं नेहरू म्हणाले होते”, मोदींची काँग्रेसवर टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे पंतप्रधानांना उत्तर

श्रीनगर : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली असून त्याला आळा घालण्यात केंद्र सरकारला अपयश आले असल्याची टीका काँग्रेसने केली. जम्मू व काश्मीरमध्ये बऱ्याच आधीपासून दहशतवाद निपटून काढण्यात आला होता. ऑगस्ट २०१९ नंतर मोठमोठे दावे करण्यात आले, मात्र ते फोल ठरले, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली.