पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात जनतेला संबोधताना सविस्तर भाषण केलं. यावेळी मोदींनी त्यांच्या सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्या योजना राबवल्या, त्याचा फायदा जनतेला कशा प्रकारे झाला आणि देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर कशी आली याविषयी उल्लेख केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी २०१४ पूर्वी केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळाचा हिशेब देताना आधीच्या सरकारशी तुलना करत टीका केली.

“आम्ही जेव्हा २०१४ मध्ये सत्तेत आलो, तेव्हा आपण जगात दहावी अर्थव्यवस्था होतो. आज आपण जगात पाचव्या स्थानी पोहोचलो आहोत. जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला हादरे देत होते, प्रशासकीय दिरंगाई देशाची ओळख झाली होती. आम्ही अर्थव्यवस्था सक्षम केली. गरीबांसाठी चांगल्या योजना आणल्या”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो, तेव्हा फक्त तिजोरी भरत नाही, देशवासीयांचं सामर्थ्य वाढतं”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.

यूपीए सरकार व एनडीए सरकारची तुलना

दरम्यान, यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आधीच्या केंद्र सरकारशी त्यांच्या कार्यकाळाची तुलना केली. “मी १० वर्षांचा हिशेब तिरंग्याच्या साक्षीनं देतोय. एवढा मोठा बदल इथे १० वर्षांत झाला. १० वर्षांपूर्वी राज्यांना ३० लाख कोटी भारत सरकारकडून दिले जात होते. गेल्या ९ वर्षांत १०० लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. आधी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडून ७० हजार कोटी जात होते. आज तो आकडा ३ लाख कोटींहून जास्त झाला आहे. आधी गरीबांची घरं बनवण्यासाठी ९० हजार कोटी खर्च होत होते. आज तो चारपट वाढून ४ लाख कोटींहून जास्त झाला आहे. गरीबांना युरीया स्वस्त मिळावं यासाठी युरियावरच्या अनुदानासाठी १० लाख कोटी रुपये दिले. मुद्रा योजनेसाठी २० लाख कोटी रुपये तरुणांना स्वयंरोजगारासाठी दिले आहेत. ८ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायाने १ किंवा २ लोकांना रोजगार दिला आहे. लघु व मध्यम उद्योगांना साडेतीन लाख कोटींची मदत देत करोना काळातही मदतीचा हात दिला”, असं मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या ५ वर्षांच्या कार्यकाळातच…”

“सर्वच बाबतीत आधीपेक्षा अनेक पटींनी आपण निधी देत आहोत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून माझ्या ५ वर्षांच्या कार्यकाळात साडेतेरा कोटी गरीब नवमध्यमवर्ग व मध्यमवर्गाच्या स्वरूपात वर आले आहेत”, असा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात केला.