२०१४ साली केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून काँग्रेस आणि भाजपामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण घडताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावरून देशातील अनेक विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली आहे. या सर्व आरोपांवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या वर्धापन दिनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नरेंद्र मोदींनी देशातील सर्व भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती महिलांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या आव्हानांची कदरच करत नाही. पण भाजपा महिलांचं आयुष्य सोपं बनवण्याला प्राथमिकता देतं”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“काँग्रेस म्हणजे छोटी स्वप्नं आणि त्याहून छोटं यश”

“हे सगळे लोक वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेत्रवाद याचे बंधक झाले आहेत. भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन चालण्याची आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्नं बघायची आणि त्याहून छोटं यश मिळवून आनंद साजरा करायचा, एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपाची राजकीय संस्कृती मोठी स्वप्नं बघणं आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करणं ही आहे”, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

“१९४७मध्ये इंग्रज निघून गेले. पण जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता इथेच काही लोकांच्या डोक्यात सोडून गेले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये देशात असा वर्ग मोठा झाला जो सत्तेला आपला जन्मजात हक्क समजत होता. या लोकांच्या बादशाही मानसिकतेनं देशाच्या जनतेला नेहमीच आपली गुलाम मानलं. २०१४मध्ये या दबलेल्या, शोषित-वंचित वर्गानं आपला आवाज उठवला. बादशाही मानसिकतेचे लोक या वर्गाचा आवाज ऐकणं तर सोडून द्या, पण पायदळीच तुडवत राहिले. त्यामुळेच आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच बादशाही मानसिकतेच्या लोकांनी शोषित, वंचित, दलित, मागास लोकांची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही”, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सामाजिक न्याय हा आपल्यासाठी राजकीय घोषणाबाजीचा विषय नसून तो आपला विश्वास आहे. गेल्या काही वर्षांत अनेक पक्ष सामाजिक न्यायाच्या नावावर राजकारणाचा देखावा करत राहिले आहेत. या पक्षांचे पक्षाध्यक्ष आपल्या कुटुंबांचं हित जोपासतात. पण त्यांच्या समाजाचं अजिबात नाही. पण भाजपा सामाजिक न्याय जगते”, असं मोदी यावेळी म्हणाले.