आपल्या कामकाजाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे १५ दिवसांत निवारण करण्यात यावे, अशा सूचना कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याआधी हा कालावधी ३० दिवसांचा होता.
भविष्यनिर्वाह निधी संस्थेची देशभरात १२३ क्षेत्रिय कार्यालये असून त्यांच्यामार्फत पाच कोटींहून अधिक सदस्यांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. संस्थेच्या नियमावलीनुसार सदस्यांच्या तक्रार निवारणासाठी सध्या १५ कार्यालयांना ३० दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यामध्ये बांद्रा, ठाणे, कांदिवली, पुणे, गुरगाव, दिल्ली, दक्षिण दिल्ली, दिल्ली (उत्तर), चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आदी कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांशी संलग्न असलेल्या सदस्यांची संख्या मोठी असून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी अमलात आणण्यास काही काळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  
नोव्हेंबर महिन्यात १३ हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले तर त्याआधी हीच संख्या १६ हजारांच्या घरात होती. १०९ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये एकाही तक्रारीचे प्रकरण ३० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी प्रलंबित राहिले नाही.