पंजाबमधील काही तुरुंगांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुन्हेगार काही बड्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांना तुरुंगातून पळून जाण्यासाठी कट रचत असल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांना दिल्याचे वृत्त आहे. मंत्रालयाने आपल्या पत्रात बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) चा उल्लेख केला आहे. पंजाबमध्ये एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या घटना घडल्या नंतर हे पत्र समोर आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, “गृहमंत्रालयाने पत्रात म्हटले आहे की, गँगस्टर-दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याने काही मोठ्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी पंजाबमध्ये तुरुंग फोडण्याची योजना आखली आहे. अहवालानुसार, संभाव्य लक्ष्य हे भटिंडा, फिरोजपूर, अमृतसर किंवा लुधियाना कारागृह असू शकतात.”

परदेशात बसलेल्या गॅंगस्टर्सनी स्थानिक गुन्हेगारांच्या माध्यमातून पंजाबमध्ये हिंसक घटना घडवून आणल्याचा समज होता. यामध्ये १४ मार्च रोजी कबड्डीपटू संदीप सिंगची हत्या, ९ मे रोजी पोलीस इंटेलिजन्स मुख्यालयावर आरपीजी हल्ला आणि २९ मे रोजी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, एसआयबीच्या सहसंचालकांनी (एमएचए) पंजाब पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “विश्वासार्ह माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये बसलेला हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याने काही बड्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी येत्या काही दिवसांत पंजाब तुरुंग फोडण्याची योजना आखण्यात आली आहे.”

या पत्रानुसार, ‘पंजाबमध्ये साथीदारांच्या वापराव्यतिरिक्त, रिंडा त्याच्या योजनेत जिहादी घटकांचा समावेश असण्याचीही शक्यता आहे. भटिंडा जेल, फिरोजपूर जेल, अमृतसर जेल किंवा लुधियाना जेल हे संभाव्य लक्ष्य असू शकतात.

रिंडा हा फरार गुन्हेगार असून तो बीकेआय प्रमुख वाधवा सिंगचा जवळचा असल्याचे मानले जाते. त्याला पाकिस्तानमध्ये आयएसआय सुरक्षा पुरवत असल्याचेही मानले जात आहे. बनावट पासपोर्ट मिळवून रिंडा नेपाळमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचा संशय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारी पंजाबचे मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी लुधियाना मध्यवर्ती कारागृहाची अचानक तपासणी केली. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की त्यांचा विभाग पंजाबमधील तुरुंगांना मोबाईल फोनपासून मुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. “आप सत्तेत आल्याच्या २.५ महिन्यांत आम्ही तुरुंगातून किमान १,००० मोबाईल फोन जप्त केले आहेत. हा एक विक्रम आहे. पंजाबमधील सर्व तुरुंगांमध्ये पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे,” असे हरजोत सिंग म्हणाले.