Rahul Gandhi Disqualified as Member of Lok Sabha : मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Video: “राहुल गांधींचं निलंबन ही काँग्रेससाठी सुसंधी”, काय आहेत कारवाईमागचे अन्वयार्थ? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मी भारतासाठी लढतो आहे आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधींवरील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक

दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असे ते म्हणाले.

याबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं आहे. आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांनी लाखो-हजारो कोटी रुपये देशातून पळवले आहे. मात्र, त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि मोदी सरकारचा धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “केवळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संदस्यत्व रद्द करण्यात आलं.