केंद्र सरकारने भारतीय सैन्याच्या भावना दुखावल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे जवानांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांची आपल्याला काळजी आहे, हे सरकारच्या कृतीतून दिसले पाहिजे, असेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन रँक वन पेन्शन (OROP) योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने करावी. जेणेकरून निवृत्त सैनिकांना पेन्शन मिळताना अडचणी येणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर काही दिवसानंतर अपंग सैनिकांसाठीच्या निवृत्ती वेतनासाठी नवे निकष लागू करण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या रखडलेल्या अंमलबजावणीमुळेही सैन्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे सैन्य आणि नागरी कर्मचाऱ्यांतील कटुता वाढत आहे, असा आरोप राहुल यांनी पत्रात केला आहे. एक जबाबदार लोकशाही म्हणून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांपर्यंत प्रेम, पाठिंबा आणि कृतज्ञता पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी जवानांना भरपाई, अपंग निवृत्तीवेतन आणि नागरी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान अधिकार मिळणे गरजेचे आहे, असे राहुल यांनी सांगितले.