राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याची दिवसाढवळ्या भररस्त्यात हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हीरादास बस स्टँडजवळ ही घटना घडली. मोटारसायकलस्वारांनी गाडीत असलेल्या दाम्पत्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. डॉक्टर सुदीप गुप्ता (४६) आणि डॉ. सीमा गुप्ता (४४) अशी दोघांची नावं आहेत

शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. मोटारसायकलवर असलेल्या आरोपींनी गाडीला ओव्हरटेक केलं आणि पुढे जाऊन गाडी थांबवली. त्यानंतर एक जण खाली उतरत त्यांच्या वाद घालताना होता. त्यानंतर क्षणाचाही विचार न करता डॉक्टर दाम्पत्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपींची ओळख पटली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून असं पोलिसांनी सांगितलं आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या घटनेनंतर राजकारण तापलं आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोर यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी घटनेचा व्हिडिओ ट्वीट करत सरकारचे वाभाडे काढले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर दाम्पत्य एका महिलेच्या हत्येत सहभागी होते. त्या महिलेसोबत डॉक्टरचे संबंध असल्याचं बोललं जात आहे.  त्या महिलेचीची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. डॉक्टरची पत्नी आणि आई या प्रकरणात आरोपी आहेत. घराला लागलेल्या आगीत तरुणी आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. दाम्पत्यावर हल्ला करणारा आरोपी हा त्या महिलेचा भाऊ असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.