Rajnath Singh Pahalgam Terror Attack: चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. वृत्तानुसार, या निवेदनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख टाळण्यात आला होता, परंतु बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा थेट उल्लेख होता. पाकिस्तानने वारंवार भारतावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे, जो आरोप भारताने पूर्णपणे नाकारला आहे.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधात कडक संदेश दिला आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली. सिंह यांनी म्हटले की, “काही देश सीमेपलिकडील दहशतवादाचा वापर धोरणात्मक साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावे. अशा देशांवर टीका करण्यास शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनने मागेपुढे पाहू नये.”

यानंतर, २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि मे महिन्यात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा थेट उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “पहलगाम दहशतवादी हल्ला ज्या प्रकारे झाला, त्याच प्रकारे लष्कर-ए-तैयबाने मागील काही काळात भारतात दहशतवादी हल्ले केले आहेत. दहशतवाद रोखण्यासाठी आणि सीमेपलिकडील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करून भारताने ७ मे २०२५ रोजी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले.”

यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या उपस्थितीतच म्हटले की, “दहशतवादाचे कोणतेही कृत्य गुन्हेगारी आणि अन्याय्य आहे. त्याचा हेतू काहीही असो, कुठेही, केव्हाही आणि कोणाकडूनही असो. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी या दुष्कृत्याचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “भारताचा असा विश्वास आहे की, बहुपक्षीय संवाद आणि सहकार्यासाठी यंत्रणा तयार केली पाहिजे. यामुळे विविध देशांमध्ये संघर्ष रोखण्यासाठी सहकार्य निर्माण करण्यास मदत होऊ शकते. कोणताही देश, कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी, एकटा काम करू शकत नाही. प्रत्येक देशाने त्यांच्या परस्पर आणि सामूहिक फायद्यासाठी एकमेकांसोबत काम केले पाहिजे. हे आमची जुनी संस्कृत म्हण ‘सर्वे जनाः सुखिनो भवन्तु’ चे प्रतिबिंब आहे, ज्याचा अर्थ सर्वांसाठी शांती आणि समृद्धी आहे.”