ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर निर्माणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ओवेसी म्हणाले, “बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद.. मशीद होती आणि राहणार. मोदी सरकार काय फक्त एका धर्माचे सरकार आहे का? मोदी सरकार फक्त हिंदूंचे सरकार आहे का? देशाचा कोणता धर्म आहे का? देशाचा कोणताही धर्म नसतो.”

अयोध्येतील राम मंदिरावर बोलत असताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मोदी सरकार केवळ एका धर्माची सरकार आहे का? की सरकार देशातील सर्व धर्मांना माननारी आहे? २२ जानेवारीच्या सोहळ्याचा विजयोत्सव साजरा करून तुम्ही कोट्यवधी मुस्लीम जनतेला कोणता संदेश देऊ इच्छिता? हा एका धर्माचा दुसऱ्या धर्मावर विजय आहे, असा संदेश सरकार देऊ इच्छिते काय? मग यातून १७ कोटी मुस्लीमांना कोणता संदेश दिला जात आहे? आमच्याशी १९४९, १९८६, १९९२, २०१९ आणि २०२२ रोजी दगाफटका झाला.

असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले, मुस्लीम जनतेला नेहमी हे दाखवून दिले जाते की, तुम्हाला जर या देशात राहायचे असेल तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. मी काय बाबरचा प्रवक्ता आहे, जिन्नांचा प्रवक्ता किंवा औरंगजेबाचा प्रवक्ता आहे? तुम्हीच सांगा मला तुम्ही कुठवर घेऊन जाणार आहात. ६ डिसेंबर १९९२ रोजी दंगली झाल्या. त्यावेळी तरुणांना तुरुंगात टाकले गेले. जे म्हातारे होऊन बाहेर आले. मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा आदर करतो. परंतु मी नथुरामाला मानत नाही. कारण नथूराम गोडसेने त्या व्यक्तीची हत्या केली, ज्याचे शेवटचे शब्द हे राम’ असे होते.