रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना तत्काळ कुठलेही पैसे न भरता (कॅशलेस) वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एक पथदर्शक योजना मे महिन्यापासून लागू करण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा संस्थेशी करार करण्यात आला आहे. सुरुवातीला २० कोटी रुपयांच्या बीज भांडवलाने ही योजना गुरगाव-जयपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवर लागू केली जाणार आहे. देशात अशा प्रकारची योजना प्रथमच राबवण्यात येत असून त्याचा फायदा जखमींना तातडीने मदत मिळण्यास होणार आहे, असे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री सी. पी. जोशी यांनी आज येथे वार्ताहरांना सांगितले. जोशी म्हणाले की, वर्षांला १.४ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात त्यामुळे कुठलेही पैसे न भरता तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास त्याचा फायदा जखमींचे प्राण वाचवण्यासाठी होऊ शकतो. हा पथदर्शक प्रकल्प दोन महिन्यात सुरू होत असून विशिष्ट कालावधीत अपघातग्रस्तांना मदत देण्यासाठी ५१ रुग्णालयांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक जखमीच्या उपचारात सरकार तीस हजार रुपये खर्च करणार आहे. आयसीआयसीआय लोंबार्ड या खासगी विमा संस्थेने या उपक्रमात सामाजिक जबाबदारी म्हणून ३० लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. दरवर्षी देशात जे १.४ लाख लोक रस्ते अपघातात मरतात त्यातील सर्वाधिक संख्या (२५०) गुरगाव-जयपूर मार्गावर असून देशात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात. योजनेची व्याप्ती नंतर वाढवली जाऊ शकते.