PM Narendra Modi message to Pakistan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूज येथील जाहीर सभेत बोलत असताना पाकिस्तानमधील नागरिकांना इशारा दिला. शस्त्रविराम झाल्यापासून पंतप्रधान मोदी पाकिस्तानला इशारे देत आहेत. भूज येथील भाषणात बोलत असताना पंतप्रधान मोदी पाकिस्तानला उद्देशून म्हणाले, “तुम्ही सुखाचे आयुष्य जगा, भाकरी खा नाहीतर माझी गोळी आहेच.”
भूज येथील जाहीर सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानातून दहशतवाद संपविण्यासाठी तेथील नागरिकांना पुढे यावे लागेल. तरूणांना पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही सुखाने जगा, भाकरी खा नाहीतर माझी गोळी आहेच.” यावेळी पंतप्रधान मोदींनी ५३,४०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. १० मे पर्यंत भारत-पाक सीमेवर लष्करी तणाव सुरू होता. त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. शस्त्रविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
भूज येथे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची मोहीम फक्त सूड घेण्यापूरती मर्यादीत नव्हती. तर माणुसकीला वाचविणे आणि दहशतवाद संपविण्याचा आमचा प्रयत्न होता. पहलगामच्या हल्ल्यानंतर आम्ही १५ दिवस वाट पाहिली. आम्हाला वाटले पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेईल. पण दहशतवादच त्यांचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून आले.
भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तराचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले, आपल्या सैन्यानी इतके जबरदस्त प्रत्युत्तर दिले की, पाकिस्तानचे हवाई तळ हे अतिदक्षता विभागात आहे. आपल्या सैन्याच्या शौर्य आणि धाडसामुळेच पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले.
भारताने ७ मे रोजी हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने ज्याप्रकारे प्रत्युत्तर दिले, त्यावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली. ते म्हणाले, पाकिस्तानने कच्छसह भारतीय सीमेवर ड्रोन हल्ले केले. पण आमच्या शूरवीर भगिनींनी हे हल्ले परतवून लावले. याआधीही १९७१ च्या युद्धात कच्छमधील महिलांनी भूज उड्डाण तळ अवघ्या ७२ तासांत बांधला होता. त्या महिलांनी मला नुकताच आशीर्वाद दिला असून सिंदूर रोप भेट दिले आहे. हे रोप मी आता पंतप्रधान निवासात लावणार आहे.
पाकिस्तानच्या विचारसरणीवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत देशांना जोडणाऱ्या पर्यटनावर विश्वास ठेवतो. पण पाकिस्तान दहशतवादालाच पर्यटन समजतो. हे जगासाठी धोकादायक आहे.
याशिवाय भारत यापुढे दहशतवाद सहन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. “जो कुणी भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करेल, त्यालाही त्याच प्रकारची किंमत मोजावी लागेल. कुणालाही सोडले जाणार नाही”, असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावले.