दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १ मे नंतरचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रातून हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे १ मे नंतर या मोसमातील आयपीएलचे कोणतेही सामने महाराष्ट्रात होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या पीठाने ही याचिका फेटाळली.
एमसीए मैदानासाठी पिण्यायोग्य पाणी नव्हे, तर प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणार असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिलला झालेल्या सुनावणीत ३० एप्रिलनंतरचे सर्व आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा निर्णय दिला. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील १ मेच्या सामन्याला फक्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच २९ मे रोजी मुंबईत होणारा अंतिम सामनासुद्धा आता महाराष्ट्रात होणार नाही. मुंबई आणि पुणे या आयपीएलमधील दोन फ्रेंचायझींनी प्रत्येकी पाच कोटी रुपये मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्य निधीसाठी देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc rejects mca plea against shifting ipl matches out of maharashtra
First published on: 27-04-2016 at 13:17 IST