Shashi Tharoor On Criticism From Congress: पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवरील कारवाई आणि ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक पावलाचे समर्थन केले आहे. याचबरोबर थरूर यांनी, नुकतेच पनामा येथे, २०१६ मध्ये दहशतवादी तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक दरम्यान भारताने पहिल्यांदाच नियंत्रण रेषा ओलांडली, असे कथित विधान केले होते.
पनामामध्ये केलेल्या या कथित विधानावरून शशी थरूर यांच्यावर त्यांच्याच पक्षातून विशेषतः उदित राज यांच्याकडून टीका झाली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शशी थरूर यांनी, “माझ्याकडे यापेक्षा महत्त्वाची कामे आहेत”, असे म्हटले आहे.
दरम्यान शशी थरूर यांनी पनामामध्ये केलेल्या विधानांवर एक्सच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, ते फक्त अलीकडील दहशतवादी हल्ल्यांनंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत होते, मागील युद्धांबद्दल नाही.
यावेळी थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यासाठी टीकाकारांचे स्वागत आहे, पण खरोखरच माझ्याकडे करण्यासारखी खूप महत्त्वाची कामे आहेत,” असे थरूर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत लिहिले.
ऑपरेशन सिंदूरनंतर शशी थरूर केंद्र सरकारच्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. हे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये जाऊन भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका मांडत आहे. दरम्यान काँग्रेस नेते, उदित राज यांनी थरूर यांच्यावर पक्षाच्या वारशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर त्यांनी थरूर यांना “भाजपाचे सुपर प्रवक्ते” बनवण्याचा सल्ला दिला आहे.
“मला पनामातून सहा तासांत कोलंबियाला जावे लागले. त्यामुळे माझ्याकडे यासाठी खरोखर वेळ नाही. पण तरीही, नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानाबद्दल बोलणाऱ्यांना मी सांगतो की, “मी फक्त दहशतवादी हल्ल्यांच्या बदल्याबद्दल बोललो होतो, मागील युद्धांबद्दल नाही”, असेही थरूर यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी पनामा येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बुधवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी म्हटले होते. महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करताना, थरूर म्हणाले की, आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले आहेत. ‘इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,” असे थरूर यांनी सांगितले.